वाशी | प्रतिनिधी :
पावसाच्या कमतरतेमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, तेरखेडा शिवार, ता. वाशी येथे सोयाबीन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची सद्यस्थिती, उत्पादनावर झालेला परिणाम आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. पावसाअभावी सोयाबीन पिकांच्या वाढीवर आणि अपेक्षित उत्पादनावर परिणाम झाल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी आणि आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद होऊन शासनाच्या मदतीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.


